मुख्य सामग्रीवर वगळा

चाणक्य - ओळख एका कादंबरीची

     'चाणक्य' या आनंद साधले यांनी लिहिलेल्या कादंबरीचे मुळ कथानक हे विशाखादत्त यांच्या मुद्राराक्षस या नाटकावर आधारित आहे. त्यामुळे त्या कथेचा क्रमही मुद्राराक्षस प्रमाणेच असून त्यात विष्णुगुप्त चाणक्य यांची व्यक्तिरेखा, त्यांची राष्ट्रभक्ती व देशाच्या हितासाठी केलेले कुटील राजकारण तसेच चंद्रगुप्त वरील प्रेम यांचे दर्शन होते.
       कादंबरी मध्ये चाणक्यांच्या व्यक्तिरेखेचं वर्णन करताना लेखक शिव शंकरांची उपमा देतात. आणि त्याचप्रमाणे चाणक्यांच्या चारीत्र्यात संतापाचे व प्रेमाचे वर्णन दिसते.
      कथेची सुरुवात विष्णुगुप्त महापद्म राजाच्या दरबारी जातो व तिथे त्याचा अपमान झाल्याने संपुर्ण नंदवंशाला नष्ट करण्याची शपथ घेतो इथून होते. चाणक्यांच्या ज्ञान व विद्वत्ता यावर भक्ति बसल्याने आणी मुलाच्या जीवाला राजमहालात धोका असल्याने तसेच चाणक्य आपल्या मुलाचे भवितव्य घडवतील या आशेने मुरा चाणक्यांच्या परतीच्या वाटेवर त्यांना भेटून चंद्रगुप्तचा सांभाळ करावा अशी विनंती करते, चाणक्यही ते मुल नंदवंशातिल नाही याची खातरजमा करून त्या मुलाला सांभाळतात. चाणक्यांनासुध्दा त्यांच्या प्रतिज्ञा पुर्तिसाठी ईश्वरानेच जनुकाही आपला आशिर्वाद दिला आहे या भावनेने त्या मुलाच पालण पोषण करण्याची जबाबदारी स्वीकारतात.
      पुढे चाणक्य चंद्रगुप्तला सम्राट पदासाठी योग्य व्हावा या उद्देशाने शिक्षण - प्रशिक्षण देतात. सोबतच पाटलीपुत्र नगरीत स्वत:ची एक गुप्तहेर यंत्रणा तयार करतात.
       काही वर्षानंतर आजुबाजुच्या राजांचे विशेष करून पर्वतकाचे सहाय्य घेउन योजनाबद्ध पध्दतीने राजधानीवर आक्रमण करतात व स्वत:च्या प्रतिज्ञेप्रमाणे संपुर्ण नंदवंशाला नष्ट करतात.
       महापद्म राजाच्या मृत्यूनंतरही त्याचा निष्ठावंत आमात्यप्रमुख राक्षस चाणक्याला कडवी झुंज देतो. राक्षस चंद्रगुप्तला मारण्यासाठी अनेक प्रयत्न करतो पण चाणक्यांच्या दक्षतेमुळे आणि कार्यप्रणाली मुळे चंद्रगुप्त वाचतो व त्याऐवजी पर्वतक मारला जातो.
         नगर प्रवेशावेळी वैरोचक हा पर्वतकाचा वारस देखिल मारला जातो. आणि असे अनेक जीवघेण्या प्रसंगातून चाणक्यांच्या आशीर्वादाने चंद्रगुप्त सुखरूप पणे बाहेर पडतो.
        राक्षसाने चंद्रगुप्तला स्वतः ची निष्ठा वहावि (कारण चाणक्याला माहित असते की जर एकदा राक्षसाने स्वतः ची निष्ठा अर्पित केली तर राक्षस कुठल्याही प्रकारचा द्रोह करणार नाही) यासाठी चाणक्य  एक विचित्र असा डाव मांडतात आणि शेवटी राक्षसाला पुन्हा आमात्यप्रमुख पद स्विकारण्यासाठी भाग पाडतात.
        कादंबरी लेखनाची शैली खुप छान आहे आणि चाणक्य आपल्या प्रतिज्ञापुर्तिसाठी व राक्षसाने शरण यावे यासाठी चाणक्य नेमकी अशी काय कुटील कारस्थाने करतो हे मुद्दाम इथे लिहले नाही त्यामुळे वाचकांच्या उत्सुकतेचा हिरमोड होईल. कारस्थानांच्या परीणामांपेक्षा त्यांचा प्रवास रोमांचक असतो अस म्हणतात याची ग्वाही ही कादंबरी वाचली की मिळते अस म्हणावसं वाटतं.
        कादंबरी लेखनाची शैली खुप ओघवती आहे त्यामुळे वाचताना प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहतात आणि वाचकांच्या मनात चाणक्य छाप सोडल्याशिवाय राहत नाही.

पुस्तकाचे नाव :- चाणक्य
लेखक :- आनंद साधले 

टिप्पण्या